Pages

संकल्पांचा संकल्प करूया...!





👉 *संकल्पांचा संकल्प करूया...!*

अवघे काही तास उरलेत नवे वर्ष सुरु व्हायला. आपल्या सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागलीय. दरवर्षी प्रत्येकजण नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणता ना कोणता संकल्प करतोच. ही जणू एक प्रथाच झालीय. तो संकल्प वर्षभरात पाळला जावो वा न जावो. मात्र संकल्प केलाच पाहिजे असं झालंय.

यावर्षीही अनेकांनी संकल्पांचे संकल्प नक्कीच केले असतील. व्यसन करणाऱ्यांनी दारु सोडण्याचा संकल्प, डायरी लिहिण्याचा संकल्प, वजन कमी करण्याचा संकल्प असे नाना तऱ्हेचे संकल्प या पूर्वसंध्येस उत्साहात जन्म घेतात. मात्र ते किती पाळले जातात हे संकल्प करणाऱ्यांनाच माहित.

विशेष म्हणजे दरवर्षी संकल्पांच्या यादीत नवनव्या संकल्पांची भर पडत असते आणि ही यादी वाढतच असते. पहिल्या दिवशी कठोर नियमाने संकल्प पाळला जातो. दुसऱ्या दिवशीही तेच घडते मात्र जसजसा आठवडा सरत जातो तसा संकल्पाची नवलाई आणि उत्साह संपत जाते. संकल्पाचे नऊ दिवस संपले की आयुष्य पुन्हा जैसे थे...

त्यानंतर आपल्याला या संकल्पांची थेट आठवण होते ती वर्षाच्या अखेरीस. वर्षानुवर्षे हे चक्र असेच सुरु आहे. जणू काही निसर्गचक्रच झालंय. मात्र हे निरीक्षण काही सगळ्यांच्याच बाबतीत लागू होते असे नाही बरं का. जे आपल्या निर्णयावर ठाम असतात, ज्यांचा निर्धार पक्का असतो त्या व्यक्ती हे संकल्प तडीस नेतातच. एखादी गोष्ट सुरु करणे फारसे कठीण नसते कठीण असते ते त्यात सातत्य टिकवणे. हे जमले म्हणजे तुमचा संकल्प पूर्ण झालाच म्हणून समजा.

मग तुम्ही काय ठरवलयं? नवेनवे संकल्प करणार की संकल्प पाळण्यात सातत्य ठेवणार. नव्या वर्षाची पार्टी नक्कीच एन्जॉय करा. मात्र त्याचबरोबर संकल्पामध्ये सातत्य ठेवण्याचे वचनही स्वत:च स्वत:ला द्या. म्हणजे पुढच्या वर्षी नवा संकल्प करायला जाल तेव्हा जुना संकल्प पूर्ण झाल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच असेल.

सरलेलं वर्ष आपल्याला बरंच काही शिकवून गेलेलं असतं जे आपल्याला पुढचं वर्ष जगण्यासाठी उपयोगी पडणार असतं. त्यामुळे आपण सरलेल्या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही हे आपण मनाशी ठाम ठरवायला हवं. आज स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवं. आपण कोण आहोत? आपण काय आहोत? आपल्याकडे काय आहे? जीवनात आपण काय केलं पाहिजे? कि ज्यामुळे आपण जग सोडल्यानंतरही लोक आपलं नाव आदराने घेतील. जर प्रत्येकाने स्वतःच्या नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक वर्षी एक संकल्प केला तर येणार प्रत्येक नवीन वर्ष सर्वांनाच सुखा समाधानाचं आणि समृध्दीचच जाईल...